“महाराष्ट्रात असेच कठोर निर्बंध कायम ठेवावे लागतील”; टास्क फोर्सचं मोठं वक्तव्य
मुंबई – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त नागरिकांना घराबाहेर फिरण्यास बंदी घातली. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच 1 तारखेला संपणारे निर्बंध हे पुन्हा वाढवले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. यावरच आता महाराष्ट्रातील टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका टाळायचा असेल तर, महाराष्ट्रात असेच निर्बंध आणखी काही दिवस कायम ठेवावे लागतील, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, असं टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ञांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊन लागल्यापासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे मृत्त होणाऱ्यांची संख्याही सध्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच आता निर्बंध आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होत आहे आणि मृत्यूचा आकडाही घसरताना पाहायला मिळत आहे. पण योग्य तो परिणाम दिसेपर्यंत 15 दिवसांचा कालावधी लागेल, असं मत टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.