#Lockdown: शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही: मुख्यमंत्री
शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात करोनाशी लढण्यासाठी लष्कराची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवरायांनी आपल्याला लढायचं कसं ते शिकवलं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा त्या जवानासारखाच आहे. इथे मला लष्कर आणायचं नाही. करोनाशी लढा आपण सगळे मिळून देत आहोत. ही लढाई आपण जिंकणारच असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
लॉकडाउन म्हणजे गतिरोधक आहेत. आपण करोना विषाणूची गती रोखली आहे. मात्र त्याची साखळी तोडण्यात आपण अजून यशस्वी झालेलो नाही. आपल्याला ही साखळी तोडून हे संकट संपवायचं आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी कालच्या बैठकीत फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर आपल्याला नको आहे. करोनाबरोबर जगा असं काहीजण म्हणत आहे. म्हणजे कसं जगायचं? असं घरात राहून? ते काही शक्य होणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.