‘प्रभू राम आणि सीता हे केवळ हिंदुंचे नाहीत, ते सर्व हिंदूस्तानींचे आहेत’; जावेद अख्तर
मुंबई : प्रभू राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत. ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आणि वारसा आहे, असा विचार प्रसिद्ध कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
जावेद अख्तर म्हणाले, राम आणि सीता हे केवळ हिंदू देव देवता नाहीत. ते आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा आहेत. मी एक कलाकार आहे. एक कलाकार म्हणून मला नेहमीच असे वाटते की, राम आणि सीता ही अवघ्या देशाची संपत्ती आहेत. त्यामुळेच मी इथे आलो आहे. अन्यथा लोक म्हणतील की जावेद अख्तर हा नास्तिक आहे, तरीही येथे कसा आला आहे. पण, राज ठाकरे हे माझे मित्र आहेत. त्यांनी मला प्रेमाने निमंत्रण दिले. अर्थात राज ठाकरे यांनी त्यांच्या शत्रूला जरी निमंत्रण दिले तरीही तो ते कसा टाळेल?
हेही वाचा – धनत्रयोदशी का साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाचे धार्मिक महत्त्व
रामायन हे आपला सांस्कृतीक वारसा आहे. तो विषय लोकांच्या आवडीचा आणि रुचीचा आहे. मला स्वत:ला अभीमान आहे की, मी राम आणि सीता यांच्या भूमीत जन्म घेतला. जेव्हा आपण मर्यादापुरुषोत्तम राम यांच्याबद्दल बोलतो तेव्हा सहाजिकच माझ्या मनात राम आणि सीता असे दोघेही येतात. त्यामुळे आजपासून आपण केवळ जय श्रीराम न बोलता जय सियाराम असेच म्हणायला हवे, असं आवाहन जावेद अख्तर यांनी केलं.
मी लखनऊचा आहे. माझे बालपण लखनऊमध्येच गेले. माझ्या बालपणी मी अनेक श्रीमंत लोकांना पाहिले आहे. जे सकाळी गुडमॉर्निंग म्हणायचे. पण त्या उलट जे सर्वसामान्य नागरिक होते ते मात्र, जय सियाराम बोलत असत. त्यामुळे आपण राम आणि सीता यांना वेगळे पाहू शकत नाही. माझ्या दृष्टीने असे करणे पाप आहे. सियाराम हा शब्दच प्रेम आणि एकतेचे प्रतिक आहे. सिया आणि राम असे स्वतंत्र फक्त एकाच व्यक्तीने केले होते. ती व्यक्ती म्हणजे रावण. त्यामुळे आपण जर राम आणि सीता वेगळे उचारत असून किंवा तसे समजत असू तर याचा अर्थ आपण रावण आहोत. त्यामुळे आताही आपण माझ्यासोबत जय सियाराम असे तीन वेळा म्हणून शकता, असंही जावेद अख्तर म्हणाले.