जरांगे-पाटील तब्येत जपा…काळजी घ्या, तुमची समाजाला गरज : माजी आमदार विलास लांडे
तुम्ही बलिदान देऊन मिळालेले आरक्षण आमच्या काय कामाचे : लांडे
![Jarange-Patil stay healthy...take care, society needs you: Former MLA Vilas Lande](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Vilas-Lande-Maratha-Reservation-780x470.jpg)
पिंपरी : कित्येक आंदोलने होतील. पण तुमच्यासारखं मातीतून उगवणार नेतृत्व तयार व्हायला काळ लोटतो. त्यामुळे तब्येत जपा..काळजी घ्या अशी भावनिक साद माजी आमदार विलास लांडे यांनी मनोज जरांगे यांना घातली आहे. सोशल मीडियावर लांडे यांनी जरांगे यांना उद्देशून लिहिलेले पत्र व्हायरल होत आहे. यामध्ये लांडे यांनी ही साद घातलेली आहे.
लांडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील नावाच्या माणसाने महाराष्ट्र हादरून सोडला आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. त्यांच्या आंदोलनापुढे सरकार, मंत्रिमंडळ अस्वस्थ आहे. प्रत्येक मराठा तरुण, गेले कित्येक वर्षांची खदखद रस्त्यावर घेऊन उतरत आहे. या सगळ्या तरुणांचे नेतृत्व करणारा मनोज जरांगे पाटील नावाचा तरुण पोरगा केवळ आपल्या सत्य वागणुकीमुळे सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. पाटील तुमच्या आंदोलनासमोर सरकारला गुडघे टेकावे लागतील. आरक्षणही मिळेल पण गेली चार दिवस तुम्ही अन्न पाणी वर्ज केले म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ असल्याचे लांडे यांनी नमूद केले आहे.
तब्येतीला जपा स्वतःची काळजी घ्या. तुम्ही बलिदान देऊन मिळालेले आरक्षण आमच्या काय कामाचे, असा भावनिक सवाल लांडे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रातल्या तरुणांना दिशा द्या. आरक्षण मिळाल्या वाचून राहणार नाही. महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांमध्ये प्रचंड ताकद आहे. पण त्यांनी विश्वास ठेवावा असा विश्वासार्ह चेहरा त्यांना कित्येक वर्षातून पहिल्यांदा सापडला आहे, तो तुमच्या रूपाने. तुमच्यासारखं सगळ्या कसोट्यांवर ताऊन सुलाखून निघणार नेतृत्व तयार व्हायला काळ लोटतो. असं नेतृत्व आता आम्हाला गमवायचं नाही. तुम्ही दिशा द्या…आम्ही लढू.. तब्येत जपा …काळजी घ्या…असे लांडे यांनी नमूद केले आहे.
मराठा आंदोलनाला पाठिंबा…
पिंपरी चिंचवड शहरात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी आंदोलने पाठिंबा दर्शवला जात आहे. या आंदोलनात माजी आमदार विलास लांडे सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच आरक्षणाच्या लढ्यात नेहमी सोबत राहू, असा विश्वास दिला.