शिवतीर्थावर मनसेची आज महत्त्वाची बैठक; अयोध्या दौऱ्याबाबत काय चर्चा होणार?
![शिवतीर्थावर मनसेची आज महत्त्वाची बैठक; अयोध्या दौऱ्याबाबत काय चर्चा होणार?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/शिवतीर्थावर-मनसेची-आज-महत्त्वाची-बैठक-अयोध्या-दौऱ्याबाबत-काय-चर्चा-होणार.jpg)
मुंबई |
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे राज्य सरकार भोंग्यांच्या नियमांबाबत अधिसूचना काढण्याच्या विचारात आहेत. तर, दुसरीकडे राजकीय बैठकांचे सत्र सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची (MNS) महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याबाबत सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारनेही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांता राज्यात भोंग्याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. तसंच, राज ठाकरे येत्या ५ जूनला सहकाऱ्यांसोबत अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज मनसेनं एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
- अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची आज बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या भूमिकेचा योग्य प्रचार व्हावा, तसेच आगामी मुंबई महापालिका आणि इतर पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याचा फायदा व्हावा, यासाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी राज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज, मंगळवारी विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत मनसेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
- भोंग्यांबाबत दोन दिवसांत निर्णय
मनसे नेते राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. भोंगे उतरवले नाही, तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील धोरण ठरविण्यात येईल. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यभरासाठी अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली.