माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र, यावरून आता गदारोळ होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या सदस्याचा राजीनामा विधिमंडळ अध्यक्षांना दिला जातो. मात्र, त्यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, ‘आतापर्यंत माझ्याकडे जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणत्याही विधिमंडळ सदस्याचा राजीनामा आलेला नाही. एखाद्या आमादाराला राजीनामा द्यायचा असेल तर तो विधिमंडळ अध्यक्षांना दिला जातो. ते मागील १५ ते २० वर्षे विधिमंडळात काम करत आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे द्यायचा, याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करावी लागते. राजीनामा देण्याची कार्यपद्धती, नियम असतात. या सर्वांचे पालन झाले आहे का? हे पाहावे लागते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर राजीनामा स्वीकारायचा की नाही, हे ठरवले जाते.’
राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, ‘एखाद्या बाबीची चौकशी सुरू असेल, तर यंत्रणांना त्यांचे काम करण्याची संधी द्यावी. एखादी व्यक्ती निर्दोष असेल तर तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. सर्वांसाठी कायदा समान आहे. एखाद्या सदस्यावर कोणतीही फौजदारी कारवाई करायची असेल किंवा त्या सदस्याला अटक केली जात असेल तर संबंधित माहिती विधिमंडळ अध्यक्षाला दिली जाते. विधिमंडळ सदस्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याची जबादारी विधिमंडळ अध्यक्षांची आहे. ती आम्ही पार पाडू.