धातूचा पुतळा पडलाच कसा? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही. माती, प्लास्टिक आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनेक पुतळ्यांचे उद्घाटन मी केलंय, पण ते कधी पडले नाही. ताशी 45 किलोमीटर हवा आली तरी हे पुतळे पडले नाही, मग हा धातूचा पुतळा कसा पडला? किंबहुना पुतळा पडला की पाडला? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. ते नांदेड येथे बोलत होते.
आज महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर सत्ताधारी भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यावरून सत्ताधारी स्वतःच्या विरोधात आंदोलन करत आहेत का? की केवळ विरोधात आहोत हे दाखवण्यासाठी आंदोलन करत आहेत, कारण सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला आहे.
हेही वाचा – ‘खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भात अनेक वक्तव्य पुढे आले आहेत. परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फूले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मला असा संशय येतो आहे की हा पुतळा पडला की पाडला?
कारण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केल्या गेल्या नाही ना? अशा संशयाला जागा आहे. त्यामुळे या पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.





