… म्हणून मध्यप्रदेशात शेतकरी आत्महत्या कमी; राज्यातील भाजप नेत्याकडून कौतूक
![... hence reduced farmer suicides in Madhya Pradesh; Appreciation from BJP leader in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/hence-reduced.jpg)
अहमदनगर | ‘मध्यप्रदेश सरकारने कृषी उत्पादित मालाच्या साठवण क्षमतेबाबत सुरु केलेली योजना समाधानकारक आहे. शेतकरी हितासाठी तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुरु केलेल्या योजनेची अंमलबजावणी सर्वत्र झाली शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो. मध्यप्रदेशमध्ये शेतक-यांच्या आत्महत्या कमी होण्यास या योजनेचे पाठबळ खूर मोठे आहे,’ अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यप्रदेश सरकारच्या योजनेचे कौतूक केले.
भजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे प्रभारी बन्सीलालजी गुज्जर, प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके, सुशिलजी तरवेजा, अशोकजी कर्नावट यांनी लोणी येथे विखे पाटील यांनी भेट घेतील. त्यावेळी यांचे स्वागत करताना विखे पाटील यांनी मध्यप्रदेश सरकारचे कौतुक केले.
महाराष्ट्राने सहकार चळवळीच्या माध्यमातून साधलेल्या कृषी विकासाचे बन्सीलालजी गुज्जर यांनी समाधान व्यक्त केले. सहकारी आणि खासगी कारखान्यातील स्पर्धेबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या उसाच्या गाळपासंदर्भात सगळीकडेच निर्माण झालेल्या प्रश्नावरही यावेळी चर्चा झाली. शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मजुरांचा मोठा प्रश्न सर्वत्र भेडसावत आहे. मध्यप्रदेशातही ही समस्या मोठी असल्याचे गुज्जर यांनी सांगितले. मध्यप्रदेश जिल्हा स्तरावर खासगी बाजार समितीच्या माध्यमातूनही चांगली आर्थिक उलाढाल होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात खासगी कारखान्यांचे प्रस्थ वाढत असले तरी, सहकारी साखर कारखान्यांनी शेतक-यांचा विश्वास संपादन केला हीच या चळवळीची जमेची बाजू आहे. सहकारी पतसंस्था, सहकारी बॅका या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला आणि विकासाला स्थैर्य मिळाले आहे. मध्यप्रदेश सरकारने शेती उत्पादीत मालाच्या साठवण क्षमतेबाबत सुरु केलेल्या योजनेबाबत मी व्यक्तिश: फार समाधानी आहे. शेतकरी हितासाठी मुख्यमंत्री चौहान यांनी सुरु केलेल्या योजनेची अंमलबजावणी सर्वत्र झाली तर शेतक-यांच्या उत्पादीत मालाचा प्रश्न सुटू शकतो. मध्यप्रदेश मध्ये शेतक-यांच्या आत्महत्या कमी होण्यास या योजनेचे पाठबळ खूप मोठे आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.