महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; एमआयएम-राष्ट्रवादी युती होणार?
औरंगाबाद | राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणतात ते चुकीचे नाही. महाराष्ट्रात एमआयएमने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे नेते व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जालन्यात बैठक झाली. त्यात राजकीय चर्चा झाली. आम्हाला नेहमीच भाजपची ‘बी टीम’ म्हणून हिणवतात. पण आमच्याशी कोणीच युतीला तयार होत नाहीत. तेव्हा आम्ही राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीत सामिल होण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा यावर ते काय प्रतिसाद देतात याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे खासदार जलील यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची शक्यता आहे.
मुळातच एमआयएमला सोबत घेण्याची कोणत्याही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही. त्यांना मुस्लिम नेते पाहिजेत. पण एमआयएम नको. काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनीही आमच्यासोबत युती करण्यासाठी पुढे यायला हवे. आम्ही तयार आहोत. आज देशाचे सर्वात मोठे नुकसान करणारा भाजप हा राजकीय पक्ष आहे. त्याचा पराभव करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे जलील यांनी सांगितले.
दोनच दिवसांपूर्वी राजेश टोपे आणि जलील यांच्यात बैठक झाली. त्यात राजकीय चर्चाही झाली. राष्ट्रवादीसोबत युतीला आम्ही तयार असल्याचे टोपे यांना सांगितले. त्यावर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी काय उत्तर देते याची आम्ही वाट पाहत आहोत, असे खासदार जलील यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे राजकारणात मोठा बदल होणार आहे. एमआयएम महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास मुस्लिम मतांची विभागणी टळणार आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे, असे मत राजकीय जाणकारांचे आहे.