कोरोना काळात झालेल्या मृत्यूंची नोंद योग्य प्रकारे झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
नांदेड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असंख्य बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर कोरोना काळात झालेल्या मृत्यूंची नोंद योग्य प्रकारे झाली पाहिजे, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. म्हणजेच त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यू नोंदणीवर साशंकता व्यक्त केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस नांदेडात आले होते. यावेळी त्यांनी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे भेट देत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोना मृत्यूंवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. मात्र, त्याची व्यवस्थित नोंद प्रशासनाला करता आलेली नाही. त्यासाठी पुन्हा एकदा ही नोंद करावी, अशी माझी विनंती राहील, असे फडणवीस यांनी नमूद केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे ही दिलासा देणारी बाब असून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहायला हवे. याबाबत आपले संबंधितांशी बोलणे झाले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालय येथे नांदेड जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोनाची आताची स्थिती, त्याअनुषंगाने केल्या जात असलेल्या उपाययोजना याबाबत फडणवीस यांनी चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला तेव्हा नांदेडात संसर्ग वाढीचा दर ४६ टक्क्यांवर गेला होता. तिथून ही लाट ओसरून आता नियंत्रणात आली आहे. त्याबाबत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अधिष्ठाता दिलीप म्हैसेकर, सीईओ वर्षा ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडआधी परभणी येथील जिल्हा कोविड रुग्णालयात भेट देऊन जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून घेतली. आमदार मेघना बोर्डीकर, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.