#CoronaVirus: परदेशातील व्यक्तींचा पळवाटांनी महाराष्ट्रात प्रवेश; आरोग्यमंत्र्यांकडून धक्कादायक माहिती समोर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Rajesh-tope-1-1.jpg)
महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. गुरूवारी दुपारपर्यंत हा आकडा ४७ होता. त्यात दोन रुग्णांची भर पडली आहे. यात एक रुग्ण लंडनवरून आलेला आहे. तर दुसरा दुबईहून घरी परतला आहे. वाढलेल्या आकड्यांविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचं ते म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. ‘राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ‘प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फेज-२ मधून फेज-३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.