#Coronavirus:केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर करावं : देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200519_172953.jpg)
मुंबई : केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर केलं पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच कोरोना व्हायरसमुळे उभं राहिलेल्या संकटचा मुकाबला सरकार पाहिजे तसा करत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना भेटीची माहिती देताना सरकारवर टीकाही केली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, मनोज कोटक यांचा समावेश होता.
राज्य सरकारने पॅकेज द्यावं
ज्याप्रकारे केंद्र सरकारने पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्य सरकारने द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे. शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी राज्य सरकारने व्यवस्था केलेली नाही. खरेदीचे पैसे केंद्र सरकार देतं, खरेदी राज्य सरकारला करावी लागते. त्याचीही व्यवस्था अद्याप झालेली नाही. खरिपाचा नवीन हंगाम आहे, त्याची व्यवस्था झालेली नाही. बियाणं, खतं, कर्ज मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर विचित्र परिस्थिती आली आहे. यासोबतच बारा बलुतेदारांसमोर मोठं संकट आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकारने एक पॅकेज दिलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांनीही पॅकेज दिलं आहे. महाराष्ट्राचं एकमेव सरकार आहे, ज्याने पॅकेज दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही पॅकेज दिलं पाहिजे. विशेषत: बारा बलुतेदारांना पॅकेज दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.”