नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने, शाळा राहणार 15 मार्चपर्यंत बंद
नाशिक – जिल्ह्यात तसेच नाशिक शहरात कडक निर्बंध असूनसुद्धा येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक शहरातील सर्व शाळा आजपासून (3 मार्च) बंद ठेवण्यात येणार आहेत. नाशिक शहर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्यानुसार शहरातील शाळा येत्या 15 मार्चपर्यंत बंद असतील.
राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपयांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. मात्र, कोरोनाला थोपवण्यात म्हणावे तेवढे यश येत नाहीये. नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे. नाशिक शहरामध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, येथील प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील सर्व शाळा येत्या 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच, 14 तारखेनंतर कोरोनाची स्थिती काय असेल त्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल. कोरोना स्थितीचा 15 मार्च रोजी आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही हे ठरवले जाईल.तसेच कोरोना वाढत असला तरी 10 आणि 12 इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती दिली तरच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल, असेही येथील प्रशासनाने ठरवले आहे.
दरम्यान, नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे येथे रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच, जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही अन्न आणि नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्याचा इशारा अ छगन भुजबळ यांनी दिला.