मुख्यमंत्र्याचे प्रवक्ते वातावरण चिघळवित आहेत; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
![CM spokespersons are simmering the atmosphere; Serious allegations of BJP leader](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/CM-spokespersons-are-simmering-the-atmosphere-Serious-allegations-of-BJP-leader-1.jpg)
अहमदनगर|‘धार्मिक स्थळांवरील भोग्यांचा विषय हा एका शहरापुरता मर्यादीत नाही. परंतु, राज्य सरकार याबाबत खरच गंभीर आहे का? मुख्यमंत्र्यांनी या संवेदनशील विषयावर बोलले पाहिजे. परंतु ते बोलत नाहीत मात्र, त्याचे प्रवक्तेच वातावरण अधिक चिघळविण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलयांनी केला आहे.
शिर्डीत प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. शिर्डीतील मुस्लिम धर्मियांनी शिर्डीच्या साई मंदिरांतील काकड आरती संदर्भात केलेल्या मागणीचे विखे पाटील यांनी स्वागत केले.
या विषयावर ते म्हणाले, ‘या संवेदशील विषयाबाबत मुख्यमंत्री चुप्पी साधून आहेत. त्यांचे प्रवक्ते वातावरण आणखी चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रवक्ते जे बोलतात ती मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे का? या सर्व विषयाबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका वेळोवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. परंतु, मुख्यमंत्री या संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत. राज्य सरकारनेच धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. शिवसेना प्रमुखांचा वेळोवेळी आधार घेणारेच आता त्यांच्या विचारापासून फारकत घेत आहेत हाच आता शिवसेनेचा अजेंडा झाला आहे,’ अशी टीका विखे पाटील यांनी केली.
ओबीसी आरक्षणासंबंधी ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणही आघाडी सरकारने घालविले. सरकारने कोणताही डेटा गोळा केला नाही, मगासवर्ग आयोगाची स्थापना केली नाही, आरक्षणाच्या संदर्भात सरकार कधीच गंभिर नव्हते. त्यामुळेच मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी आरक्षण घालविण्याचे पाप आघाडी सरकारने केले असून, याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावीच लागेल,’ असेही विखे पाटील म्हणाले.