मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेला मान्यता, ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
अलिबाग – मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. नवीन योजनेमुळे अधिकाधिक ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. ही योजना मंजुरीसाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विशेष पाठपुरावा केला असून ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्वावर योजना राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेची विदर्भ व मराठवाड्यातील 17 जिल्ह्यातील सर्व तालुके व उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण ग्रस्त तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत होती. ही योजना राज्यातील इतरही सर्व तालुक्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
असे मिळेल अनुदान- शाश्वत सिंचन योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान मिळणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.