चिमुकल्याने केला मंत्र्यालाच प्रश्न, मंत्री झाले अवाक्
सांगली|साहेब काय चाललंय?’, असा प्रश्न राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना विचारण्यात आला. मात्र, हा प्रश्न कोण्या नेत्याचा अथवा कार्यकर्त्याचा नव्हता, तर हा प्रश्न होता एका चिमुकल्याचा कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्यांच्या मतदारसंघातल्या एका चिमुकल्याने आपसुक भेटल्यानंतर विचारला. आणि अवाक् झालेले मंत्री विश्वजीत कदम यांनी देखील, ‘माझं बरं चाललंय’,असं मिश्किल उत्तर देत चिमुकल्यांसोबत गप्पा मारल्या.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघातल्या पलूस तालुक्यातल्या बुर्ली या ठिकाणी आले होते. त्यांनी एका कार्यकर्त्याच्या घरी चहा घेतला आणि मंत्री कदम घरातून बाहेर पडले. आजूबाजूला पोलीस आणि कार्यकर्त्यांचा लवाजमा होता. वाट काढत जात असताना, त्याच्या समोर शाळा सुटलेली चिमुकल्यांची फौज थांबले होती. मंत्री विश्वजीत कदम यांना पाहताच हस्तांदोलन करण्यासाठी चिमुकल्यांचे हात पुढे आले. मंत्री विश्वजीत कदम यांनी देखील मुलांबरोबर हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका चिमुकलीने मंत्री विश्वजित कदम यांना थेट ‘साहेब काय चाललंय?’, असा प्रश्न उपस्थित केला. चिमुकल्याच्या तोंडातून अगदी एखाद्या पोक्त नेता किंवा कार्यकर्त्याप्रमाणे आलेला प्रश्न ऐकून मंत्री कदम आवाक् झाले आणि पटकन, ‘बरं चाललंय’,असे उत्तर देऊन टाकले. त्यानंतर मंत्री कदम यांनी मुलांची विचारपूस करत त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसेच फोटो शूट करून, चॉकलेट देऊन ते निघून गेले. मात्र, चिमुकल्यांच्या तोंडातून आपुलकीचा धाडसी प्रश्न ऐकून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.