राज्यात ३ दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पुढील तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची देखील शक्यता आहे.
आजदेखील विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. भंडारा, चंद्रपूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. तसेच नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. नागपूरकरांना सूर्याचं दर्शन देखील झालं नाही. आता येत्या १३ जानेवारीपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तसेच इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट –
आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदडे, तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ ते १३ जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
10 आणि 13 ता. विदर्भात व 10 ता. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता;
येत्या 2-3 दिवसांत मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता.
– IMD
For more details pl visit https://t.co/eAIy8vzk7ehttps://t.co/VGQVXMkDHe pic.twitter.com/eHckeaH7Tt— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 10, 2022
उत्तरेकडील पश्चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यांच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवड्याला पावसानं झोडपून काढले आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मृगाचा संत्रा देखील गळून पडला आहे.
थंडीही वाढणार –
पावसाबरोबरच नागरिकांना कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे. कारण, मध्य महाराष्ट्रात तापमान २-३ अंश घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे.