रत्नागिरीत ढगफुटीची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
![Chance of cloudburst in Ratnagiri, forecast by meteorological department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rain-and-storm-1.jpg)
रत्नागिरी – महाराष्ट्राच्या विविधा भागात मंगळवार मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून मुंबईसह अनेक भाग जलमय झाले आहेत. यातच, हवामान विभागाने आता कोकणाला सतर्कतेचा इशारा दिला असून पुढील दोन दिवस कोकणात ढगफुटी होण्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे.
मागील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशात 11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादिवशी रत्नागिरीत पडणारा पाऊस ढगफुटी प्रमाणे असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे.
11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे या दोन दिवशी खबरदारीची उपाय म्हणून जिल्ह्यात कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिकेतील 31 गावांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर नदीला पूर येऊन पाणी संबंधित गावात शिरू शकते. त्यामुळे या गावांना अधिक धोका आहे.
दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातही मंगळवारपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तर काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. उद्या म्हणजे 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक असणार आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच समुद्र, नदी, धरण वाहत्या पाण्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.