अनिल देशमुखांचा राजीनामा आल्याशिवाय भाजपचे आंदोलन थांबणार नाही, फडणवीसांचा निर्धार
![BJP's agitation will not stop till Anil Deshmukh resigns, decides Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/devendra-fadnavis-pc.png)
नागूपर – देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतरच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यावर देवेंद्र फडणवीसांनीही पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. पवार सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न कराताहेत असं फडणवीस म्हणाले. पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीसांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत आरोपांना खोडून काढण्याचा प्रयत्न केला तसेच, अनेक प्रश्नही उपस्थित केले.अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला.
वाचा :-फडणवीस दिल्लीत गेल्यावरच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं- शरद पवार
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले, असंही फडणवीस म्हणाले.
गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. तसंच, सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमवीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५ २० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का, असंही फडणवीस म्हणाले आहेत.