फडणवीस दिल्लीत गेल्यावरच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं- शरद पवार
नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर बोलताना शरद पवारांनी ज्युलिओ रिबेरोसारख्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हेच मुख्यमंत्री ठरवती, असंही शरद पवार म्हणाले. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईत सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यातच, गृहमंत्र्यांवर परमबीर सिंग यांनी काल १०० कोटी वसुलीचा आरोप केला. त्यामुळे राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘मी आताच आग्र्याहून आलो आहे. मी या प्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही देशमुखांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि सहकाऱ्यांशीही चर्चा करू, असं पवार यांनी सांगितलं. उद्यापर्यंत देशमुखांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्या पर्यंत मात्र, राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे,
फडणवीस आले आणि लेटर आलं
यावेळी पवारांनी विरोधी पक्ष आणि परमबीर सिंग यांचं साटंलोटं असल्याचे संकेतही दिले. विरोधी पक्षनेते दिल्लीत आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली. परमबीर सिंगही दिल्लीत आले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं. ते अनेकांच्या संपर्कात असतील. त्यांच्याशी बोलले असतील. त्यानंतरच पत्रं आलं असावं, असंही पवार म्हणाले. मात्र, यावेळी पवारांनी कुणाचंच थेट नाव घेतलं नाही.
पवारांची निरीक्षणं
यावेळी पवारांनी सिंग यांच्या पत्रावर काही निरीक्षणे नोंदवली आहे. सिंग यांच्या पत्रावर सही नाही. तसेच त्यांनी गृहमंत्र्यांना 100 कोटी रुपये दिले जात असल्याचं म्हटलं आहे. परंतु हे पैसे कसे दिले गेले याचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. कुणाकडे दिले याचाही उल्लेख नाही. तसेच बदली झाल्यानंतरच सिंग यांनी हे आरोप केले आहेत, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. बदली होत असल्याने सिंग नाराज होते. त्यामुळे त्यांनी हा आरोप केल्याचंही पवार म्हणाले.