‘पेशवे हे द्रुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे होते’; भालचंद्र नेमाडेंचं विधान
![Bhalchandra Nemade said that the Peshwas were corrupt and base in nature](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Bhalchandra-Nemade-1-780x470.jpg)
मुंबई : पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र दुसऱ्या बाजीरावाने वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला, असं विधान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. त्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. ते मुंबईतल्या व्याख्यानात बोलत होते.
भालचंद्र नेमाडे म्हणाले की, मी विद्यार्थी असताना आणि M.A. करत असताना मुंबई विद्यापीठात मी येऊन बसत असे. मराठीत मी नापास होणार होतो म्हणून मी तो विषय सोडला आणि इंग्रजी विषय निवडला. पण मराठी भाषेविषयी मला प्रेम होतं म्हणून मी येऊन बसायचो. इथे अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आली. त्यावेळी मी नाटक लिहिण्याचं मनावर घेतलं होतं. दुसऱ्या बाजीरावावर मला नाटक लिहायचं होतं. वा. सी. बेंद्रे इथेच बसत असायचे. त्यांच्याकडे आम्ही चर्चेसाठी जायचो. काय वाचायचं त्याचा सल्ला घ्यायचो. पेशवे दप्तर वाचा इथे खूप आहे असं त्यांनी मला सुचवलं होतं. त्यावेळी मी इतिहास वाचला आणि माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंत जो काही इतिहास आपण वाचत आलो तो काही खरा नाही. आपण खऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजीरावावर लिहिलं पाहिजे.
हेही वाचा – तुमचा राग ‘असा’ करा कमी, वाचा ३०-३०-३० चा नियम..
दुसरा बाजीराव हा खूप मोठा माणूस होता कारण त्याने पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात दिला. पेशवे हे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरण द्यायचं झालं तर मी नानासाहेब पेशव्यांचं देईन. तरुणांना मी आज हे सांगू इच्छितो की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं कठीण आहे त्यामुळे पुस्तक वाचलं की सत्य कळतं. असंही यावेळी नेमाडे यांनी म्हटलं आहे. नानासाहेब पेशवा कुठेही गेला की त्याचं पत्र असायचं तो कुठेही गेला की त्यांचा गोविंदपंत बुंधेले हा त्यांचा सरदार होता त्याला हे पत्र लिहून सांगायचे मी या या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येणार आहे. आठ ते दहा वर्षांच्या दोन शुद्ध आणि सुंदर मुली तयार ठेवाव्यात असं पत्र आहे मी ते वाचलं आहे. आठ ते दहा वर्षांच्या मुली, हा माणूस (नानासाहेब पेशवे) ४०-४२ वर्षांचा. हा त्या कशासाठी तयार ठेवायला सांगायचा? हा त्यांना मारायचा की अजून काही करायचा ते माहित नाही, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.
अशा या पेशव्यांच्या तावडीतून आपण सुटलो ते फार बरं झालं असं मी बेंद्रे यांना सांगितलं. तेव्हा बेंद्रे संतापले, इंग्रजांकडे महाराष्ट्र जाणं चांगलं आहे का? त्यावर मी त्यांना म्हटलं की आम्ही लिळाचरित्र ऐकून मोठे झालो. तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म गेला. चक्रधर स्वामी आणि तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोण आहे जगात? त्यांचा आदर्श आम्ही ठेवला. त्यामुळे खरं आहे ते आम्ही पाहिलं. इंग्रज त्यांच्यामुळेच आले. पेशव्यांच्या बदमाशीमुळेच इथे आले. इंग्रजही बदमाशच होते पण आपल्यापेक्षा कमी होते असंही नेमाडे यांनी म्हटलं आहे.