सावधान! उन्हात बाहेर पडत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
जळगाव | राज्यात उष्णतेची लाट आली आहे. या उष्णतेमुळे सर्व जनता होरपळून निघत आहे. जळगाव जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर येवून पोहचला आहे. उन्हापासून बचाव न करता तुम्ही जर बाहेर फिरणार असाल तर तुमच्यासाठी हे धोक्याचं होऊ शकतं. खरंतर, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात जीवघेण्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, मालेगाव अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ४ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून तापमान ४० अंशांच्या पुढे असल्याने नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो. पुढील काही दिवस सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. या काळात उष्मघात होऊन मृत्यू होण्याची शक्यतादेखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन जिल्हाप्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले.
इतकंच नाहीतर वाढत्या तापमानात पुरेसे पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्याचा परिणाम म्हणून रक्तात गुठळ्या तयार होऊन तुम्हाला पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. सध्या जळगाव जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली. विनस थरंबोसिस प्रकारातील पॅरारालीस होत असल्याची माहिती मेंदूविकारतज्ञ डॉ तेजेंद्र चौधरी यांनी दिली. असे काही रुग्ण आढळून आले असून खाजगी रुग्णालयात उपचारानंतर ते बरे झाले आहेत. पण हा गंभीर आजार आहे. त्यामुळेे नागरिकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी पुरेसे पाणी प्या. आहार चांगला ठेवा.