खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती, सरकारचा आदेश
मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चिन्ह असून, दररोज 25 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळू लागले आहे. कोरोनाव्हायरस संकटाच्या सुरुवातीनंतर पहिल्यांदाच दररोज एवढे रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारीच उपस्थिती राहतील, असे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थितीदेखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही. उत्पादन वाढविण्यासाठी व सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळता यावेत यासाठी शिफ्टमध्ये वाढ करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25,681 एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत 3062 एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील गेल्या सहा दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या एक लाख नऊ हजार 178 एवढी झाली आहे.