“दिपाली चव्हाण प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती करा”
मुंबई |
मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. वाढता रोष लक्षात घेऊन सरकारने याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांनाही निलंबित केलं आहे. रेड्डी यांच्यावर उशिराने करण्यात आलेल्या कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन, त्याशिवाय सरकार हलत नाही,” असं म्हणत फडणीस यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक आणि आर्थिक छळ, अंतर्गत तक्रार समित्यांचा अभाव, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं प्रचंड नैराश्यातून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी जीवन संपवलं. या प्रकरणानंतर राज्याभरातून संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून भूमिका मांडली आहे.
“अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्यांची तत्काळ नियुक्ती करा. जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा,” अशा मागण्या फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.
खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट.
प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
‘मेळघाटातील दलदलीत मी अडकत चालले आहे’
दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मेळघाटातील दलदलीत मी अडकत चालले आहे’, या त्यांच्या मृत्यूपूर्व शब्दांनी वरिष्ठांच्या जाचाची जंत्रीच उघड केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दीपाली गर्भवती असताना त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मालूर या दुर्गम गावी कच्च्या रस्त्यावर सलग तीन दिवस गस्तीवर पाठवले. त्यातच त्यांचा गर्भपात झाला. तरी दीपाली यांना सुटी देण्यात आली नाही, हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक अमानवीय चेहरा त्यांच्या मृत्यूपूर्व पत्रातून समोर आला होता.
वाचा- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार