breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर परिसरात आषाढी यात्रेत यंदाही नऊ दिवसांची संचारबंदी

सोलापूर |

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. १७ ते २५ जुलैपर्यंत नऊ दिवस पंढरपूर व परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

२० जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यादिवशी पहाटे अडीच वाजता विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय महापूजा होणार आहे. यात्रा काळात पूर्वापार प्रथा व परंपरेने चालत आलेले मंदिरातील विविध धार्मिक विधी जपण्याच्या दृष्टीने शासनाने परवानगी दिली आहे. २० जुलै रोजी आषाढी एकादशी असली तरी ११ जुलै ते २८ जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.

१९ जुलै रोजी संतांच्या मानाच्या दहा पालख्या दुपारी तीन वाजता वाखरी येथे दाखल होणार आहेत. प्रत्येकी ४० वारकऱ्यांसह एसटी बसने पालख्यांचे वाखरीत आगमन झाल्यानंतर तेथून तीन किलोमीटर अंतराचा पालख्यांचा प्रत्येकी दोन मानकऱ्यांसह पायी प्रवास होणार आहे. उर्वरित सर्व वारकरी मंडळी आपापल्या एसटी बसमधून येतील. १९ जुलैपासून मानाच्या पालख्या पंढरपुरात मुक्काम पूर्ण झाल्यानंतर २४ जुलै रोजी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे शंभरकर यांनी स्पष्ट केले. यात्रा काळात पंढरपुरात चंद्रभागा नदीत भाविक व वारकऱ्यांना करोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन स्नान करण्यास बंदी राहणार आहे. सार्वजनिक व खासगी वाहतुकीलाही बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नऊ गावांचा समावेश

१७ जुलै रोजी दुपारी दोन ते २५ जुलै रोजी दुपारी चापर्यंत पंढरपूर व परिसरातील नऊ  गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात भाटुंबरे, गोपाळपूर, वाखरी, चिंचोळी—भोसे, शेगाव दुमाला, कौठाळी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण व लक्ष्मी टाकळी या गावांचा समावेश राहील, असे जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button