मुंबईत कुर्ल्यानंतर कल्याणमध्ये इमारत कोसळली, एक जण जागीच ठार
ठाणे : मुंबईतील कुर्ला येथे काल नाईक नगर परिसरात ४ मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेले यात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर आज कल्याण पश्चिममधील रामबाग येथे अतिधोकादायक असलेली एक मजली इमारत आज (बुधवार) सकाळी कोसळली. या इमारतीत राहत असलेले दोन जणांवर इमारतीचा ढिगारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, प्राथमिक उपचार सुरू असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला.
रामबाग विभागात २५ वर्षाहून अधिक वर्षाची कोशे नावाची इमारत आहे. दोन माळ्याची ही इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमधील रहिवासी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर सूर्यभान काकड (५२), उषा काकड (४९) हे कुटुंब राहत होते. ही इमारत धोकादायक झाल्याने पालिकेच्या ब प्रभागातून वेळोवेळी या इमारतीच्या मालकाला इमारतीमधील रहिवासी बाहेर काढण्याच्या, इमारत निष्कासनाच्या नोटिसा दिल्या, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र, त्यांनी ही इमारत खाली केली नाही आणि ही दुर्दैवी घटना घटली. इमारतीचा ढिगारा बाजुच्या घरांवर पडल्याने रज्जाक शेख यांच्या घराचे देखील नुकसान झालं आहे.
मुंबईत पावसाळा सुरू झाला की दरवर्षी इमारत कोसळण्याच्या घटना घडतचं असतात यात अनेक लोकांचा बळी देखील जातो. यंदाचा पावसाळा सुरू होत असतानाच काल कुर्ल्यातील नाईक नगर परिसरातील ४ मजली इमारत कोसळली तर आज कल्याण पश्चिममधील रामबाग येथे एक मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. आजच्या दुर्घटेनत एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, अशा घटनांमुळे जुन्या आणि धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.