राज्यात आज ९ हजार ७९८ नवे कोरोना रुग्ण, १४ हजार रुग्णांना डिस्चार्ज
![9 thousand 798 new corona patients, 14 thousand patients discharged in the state today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/coronavirus-2-1580265226.jpg)
मुंबई | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ओघ कमी होत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ९ हजार ७९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून १४ हजार ३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, १९८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण १,३४,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.