राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात
महापालिका निवडणूक संकटात, कारण काय?
मुंबई : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे राजकीय नेते पायाला भिंगरी लावून सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाकडूनही या निवडणुकींची तयारी पूर्ण होत आली आहे. आता 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना आता मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 15 ते 20 हजार मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मतदानावर बहिष्कार
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 15 तारखेला मतदान पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच जुहू परिसरातील 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी निवडणूक संकटात आली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
नेत्यांची फक्त आश्वासने
जुहू परिसरात मिलिटरी रडार असल्यामुळे 35 वर्षापासून येथील 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्ट्या विकासापासून दूर आहेत. जवळपास 15 हजार ते 20 हजार लोक या धोकादायक इमारतींमध्ये राहतात. या भागातील लोकांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्यांना यात यश मिळालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी येखील नागरिकांना त्यांच्या प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर नेते मदत करत नसल्याचं म्हणत नागरिकांनी पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकरा आहे.
मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी घेतली मतदारांची भेट
मुंबईतील जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात रहिवाशांकडून मतदानावर बहिष्कार घातल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी या नागरिकांची भेट घेतली. तसेच निवडणुकीनंतर नागरिकांची आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून देत समस्यांचा पाठपुरावा करून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता येथील नागरिक मतदानावरील बहिष्कार मागे घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




