20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या तब्बल 305 शाळा बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय…
मुंबई | महाईन्यूज |
वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या राज्यातील तब्बल 305 शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. मागच्या सरकारचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असाच पट संख्येमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी त्या निर्णयाला विरोध केला होता.
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 नुसार इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या बालकांच्या वस्तीलगत एक किमीपर्यंत शाळा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. तसेच 6 ते 11 वर्षे वयोगटातील किमान 20 बालकांसाठी शाळा स्थापन करण्याचेही नमूद आहे. त्याचवेळी लहान वस्तीतील बालकांना शिक्षण देण्यासाठी वाहतूक भत्ता व सुविधा उपलब्ध करन देण्याचीही तरतूद आहे.
या निर्णयावर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तावडे म्हणाले, हे करंटं सरकार आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची वाट लावण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे. या शाळा बंद करून वाहतूक व्यवस्था सुरू करा असा कपिल सिब्बल यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारचे निर्देश होते. शाळा चालवायला डोकं लागतं असं स्वतः शरद पवार म्हणाले होते, आता तुमच्या सरकारला बंद करण्याची अक्कल कोणी दिली कळेल का? आम्ही शाळा बंद केली नव्हत्या फक्त कमी विद्यार्थी असलेल्या शाळेतून जवळच्या शाळेत विद्यार्थी पाठवले होते. आता गरीब मुलांच्या 850 शाळा बंद करायला कोणती अक्कल लागते हे या सरकारनं स्पष्ट करावे.