169 नाही, ‘170’ चा आकडा खरा ठरला- खासदार संजय राऊत
महाईन्यूज | मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह छोटे पक्ष, अपक्षांनी ठाकरे सरकारच्या बाजूने मतदान केल्याने बहुमताचा 145 हा आकडा सहज पार झाला. त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आजपासून ठाकरे सरकार अस्तित्त्वात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे पहिल्यापासून सांगत होते, घासून नाही तर ठासून येणार, 170 आमदारांचं समर्थन मिळणार. राऊतांचं हे भाकीत खरं ठरलं आहे.ठाकरे सरकारच्या बाजूने 169 आमदारांनी मतं दिली असली, तरी महाविकासआघाडीचं खरं संख्याबळ हे 170 होतं. कारण दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे, ते मतदान करु शकले नाहीत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यादरम्यान भाजपने गोंधळ घालत, सभात्याग केला.मात्र सभागृहात विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्त्वात काटेकोरपणे पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.