महाराष्ट्रात दोन लाख रुपयांहून अधिक कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा ?
‘त्या’ शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार करणार : अर्थमंत्री जयंत पाटील
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा वेगळा विचार महाराष्ट्र विकास आघाडी सरकार करणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अचूक माहिती मिळवली जाईल व त्या माहितीच्या आधारे एकूण थकबाकीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मागील सरकारने शंभर अटी घालून कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांना कित्येकदा हेलपाटे मारावे लागले होते. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सरळ व सोप्पी कर्जमाफी जाहीर केली ज्यामध्ये शेतकऱ्यांचे थम्ब इंप्रेशन घेऊन शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला न लावणारी कर्जमाफीची व्यवस्था करत आहोत. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांना ही व्यवस्था आवडत नसेल, अशा शब्दांत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. शिवाय, ही कर्जमाफी सरळ असून कोणत्याही अटी नाहीत. तरी, दोन लाखांपर्यंत असणारे कर्ज, नियमित भरणारे कर्ज आणि दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या तिन्ही घटकातील शेतकऱ्यांना अंशत: किंवा पूर्णत: समाधानकारक कर्जमाफी देऊ, असा विश्वास अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.