1 ऑक्टोबर पासून लागू होणार नवे टोल दर
आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मुंबई मधील टोल दरात वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांना 5 ते 25 रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कायम राहणार आहेत. मुंबई , मुलुंड , वाशी , ऐरोली आणि दहिसर मधून मुंबई एंट्री पॉईंट बुथवर 1 ऑक्टोबरपासून टोलदर वाढणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रवासी कारच्या एकतर्फी प्रवासासाठी 35 रुपये मोजत होते. त्याऐवजी आता 40 रुपये टोल भरावा लागणार आहे. 35 रुपयांचा टोल गेल्या 6 वर्षांपासून लागू होता.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, एमएमआर क्षेत्रात 55 उड्डाणपूल बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी 2002 ते 2027 या कालावधीत 25 वर्षे टोल वसुली करण्यात येणार आहे. मुंबई एन्ट्री पॉईंट टोल लिमिटेड ला 2027 पर्यंत 11,500 कोटी रुपयांचा निधी टोल वसूलीतून मिळण्याची आशा आहे.
1 ऑक्टोबर पासून लागू होणारे नवे टोल दर:
कमी वजनाच्या कमर्शियल वाहनांच्या एकतर्फी प्रवासासाठी टोल दर 10 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता अशा वाहनांना 65 रुपये टोल भरावा लागणार आहे. ट्रॅक आणि बसेसच्या दुतर्फी प्रवासाच्या टोल दरात 25 रुपयांनी वाढ केली असून त्यासाठी आता 130 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी या ट्रॅक आणि बसेसला टोल दर 105 रुपये होता. मल्टी एक्सल वाहनांसाठी टोलदरात 25 रुपयांनी वाढ झाली असून ही किंमत आता 160 रुपये झाली आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील टोल वसूली बंद केली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा टोल आकारण्यास सुरुवात झाली. दरम्यान, टोलमध्ये होणारी वार्षिक दरवाढ यावर्षी करु नये जेणेकरुन कोवि़ड-19 लॉकडाऊन काळात वाहतूक क्षेत्राला झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यास मदत होईल, अशी मागणी प्रायव्हेट बस आणि लॉरी ऑपरेटर्स यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली होती.