३० लाख प्रवाशांची वातानुकूलित लोकलला पसंती
२५ डिसेंबर ते ३० सप्टेंबपर्यंत १२ कोटींचा महसूल
पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीला प्रवासी मिळतील की नाही, अशी शंका असतानाच आतापर्यंत ३० लाख २४ हजार २२९ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या उकाडय़ामुळे या गाडीला चांगलीच गर्दी होत आहे. २५ डिसेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेला १२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर, २०१७ रोजी मुंबईतील पहिली वातानुकूलित लोकल धावली. ही लोकल चालविण्यासाठी दररोजच्या सामान्य लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बराच वादही झाला. त्यातच वातानुकूलित लोकलचे तिकीट दर हे जादा असल्याने सुरुवातीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत गेला.
या लोकलमधून डिसेंबर, २०१७ मध्ये नऊ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. जानेवारी २०१८ मध्ये हाच प्रवासी आकडा १ लाख ७७ हजार ४४७ पर्यंत पोहोचला. सप्टेंबर २०१८ मध्ये ही संख्या ३ लाख ८२ हजार १०३ पर्यंत पोहोचली. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ३० लाख २४ हजार २२९ प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला आहे.
या गाडीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले. त्यातून १२ कोटी ४५ लाख ५६ हजार रुपये महसूलही रेल्वेला प्राप्त झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या दररोजच्या प्रवासी संख्येचा आकडा सध्या १५ हजार ६५१ पर्यंत आहे. वातानुकूलित लोकल गाडीच्या १२ फेऱ्या होत असून एका फेरीत सरासरी १३०४ प्रवासी प्रवास करतात.