हिंगणघाट जळीत प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम हाताळणार…
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ एड.उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीनं पीडितेची बाजू मांडणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली.
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या विरोधात राज्यभरात संताप आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असतानाच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज महत्त्वपूर्ण ट्विट केलं आहे.
‘हिंगणघाटमधील जळीत प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाकडं दिला जाईल. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याशिवाय, पीडित तरुणीचा खटल्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.