सोनई हत्याकांड: पाचजणांची फाशी कायम, उच्च न्यायालय
मुंबई – अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या हत्याकांडातील दुसरा आरोपी अशोक नवगिरेची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१३मध्ये अहमदनगरच्या सोनई गावात हे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं
या आधी २०१८ मध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयाने सहा जणांना फाशीची शिक्षा दिली होती. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आज त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाचजणांना फाशीची शिक्षा सुनावली असून अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२०१३मध्ये अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई गावात ऑनर किलिंगची घटना घडली होती. प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे तुकडे करून सेफ्टिक टँकमध्ये टाकण्यात आले होते. खर्डा आणि जवखेड प्रकरणाच्या आधीची ही घटना आहे.