सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण : आदित्य ठाकरे यांचा संबंध नसताना त्यांच्यावर का बोलले जाते – नारायण राणे
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाच रविवारी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध नसताना’ त्यांच्याबाबत का बोलत आहेत, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
“मी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. जेव्हा त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यावेळी ते यावर का बोलत आहेत?,” मुंबई पोलीस दबावाखाली तपास करत आहे, आणि सीबीआय तपासातून सर्व सत्य समोर येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर अपेक्षा वाढल्याचे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं.
५ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या आहे, असं राणे म्हणाले होते. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. “१३ जून रोजी रात्री सुशांतच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये महाराष्ट्रातील एक मंत्रीही उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर ते मंत्री त्याच्या घरातून निघून गेले आणि सकाळी सुशांतचा मृतदेह सापडला,” असं राणे म्हणाले होते.
सुशांतच्या घराच्या बाजुलाच असलेल्या अभिनेता डिनो मोरियाच्या घरी रोज मंत्री येतात. ते रोज त्या ठिकाणी येऊन काय करतात ? असा सवालही राणे यांनी केला होता. दरम्यान राणे यांनी ते मंत्री कोण याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु, पोलीस जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी येतील तेव्हा सर्वांना याची माहिती मिळेल आणि आपण त्या मंत्र्याच्या फोटोसहित पुरावे घेऊन माध्यमांसमोर येणार असल्याचं ते म्हणाले होते.