सुरक्षा हटवण्याचं कारण त्यांनाच माहिती असेल- रावसाहेब दानवे
मुंबई – ठाकरे सरकारने राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरून सध्या राज्यात घमासान सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शंका उपस्थित केली आहे.
वाचा :-सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पलटवार
भाजप महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणीसाठी लोणावळ्यात आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सुरक्षा कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविषयी रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले,”राज्य सरकार ज्या भावनेनं काम करत आहे. वागत आहे. त्याचा उद्देश काय आहे, हे मला माहित नाही. त्यांनी अनेकांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचं संरक्षण पोलीस करतात असं नाही. आमचं संरक्षण या राज्यातील जनता करतेय. सुरक्षा हटवल्याने आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ, असं नाही. सुरक्षा हटवण्याचं कारण त्यांनाच माहिती आहे,” असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.