सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव, पुणे जिल्ह्यांना पावसाचा फटका तर,पंढरपूर, सांगोला तालुक्याला ढगफुटीचा मोठा झटका
![रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Mumbai-Rain-2.jpg)
काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांमधील धरणं फुल्ल भरली आहेत. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव, पुणे जिल्ह्यात पावसाचा फटका मोठ्या प्रमात बसला आहे. अनेक गावे जलमय झाली असून लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकरी उध्वस्त झाले आहेत. अचानक 18 सप्टेंबरला रात्री सुरु झालेल्या पावसाने अनेकांचे नुकसान केले आहे तर शेतातील उभी पिके मातीसह या तुफान पावसात वाहून गेली. पंढरपूर तालुक्यातील उपरी, पळशी, सुपली परिसरात झालेल्या तुफान पावसाने आज दोन दिवसानंतर आलेले पुराचे पाणी ओसरल्यावर शेतकरी आता नुकसानीची पाहणी करायला आपल्या शेताकडे आणि घराकडे परतू लागली आहेत.
या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या कसाळगंगा ओढ्याचे गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात काम झाल्याने याची खोली व रुंदी वाढवण्यात आली होती. सुदैवाने याचाच फायदा या अतिवृष्टी झालेल्या गावांना झाला आहे. अन्यथा या तुफान पाण्यात अनेक गावे जलमय झाली असती. अनेक परिसरातील विजेचे खांब मोडून पडले असून रस्त्यावर सर्वत्र विजेच्या तुटलेल्या तारा दिसत आहेत. अनेक वस्त्यांवरील घरातील संसाराचे साहित्य, खाते, बियाणे, अन्न धान्य या पुरात वाहून गेलाय तर अनेक शेतकऱ्यांच्या बकऱ्या, म्हशी, शेळ्यादेखील यात वाहून गेल्याने या भागातील बळीराजा अक्षरशः उघड्यावर आला आहे.