सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करा – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200401-WA0004.jpg)
उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणू (Covid – 19)प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य प्रति माह 5 किलो याच परिमाणात मोफत अन्नधान्य वितरीत करावयाचे आहे. म्हणजे अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या नियमित 35 किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर ही अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करावयाचे आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेवर 1 सदस्य असल्यास 5 किलो, 2 सदस्य असल्यास 10 किलो याप्रमाणे तांदळाचे मोफत वितरण करावयाचे आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले.
कोरोना विषाणू (Covid – 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्न धान्य वितरीत करताना सर्वप्रथम माहे एप्रिल, मे व जून 2020 साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिलेल्या अन्न धान्याचे वाटप त्या त्या महिन्यात करावे, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी स्पष्ट केले.
तद्नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात आलेल्या तांदळाचे लाभार्थ्यांना वितरण करावे. या तांदळाचे वाटप करताना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्न धान्याची उचल केली आहे याची खातरजमा करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी केली. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनादेखील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या 5 किलो प्रति सदस्य याप्रमाणे अन्नधान्य वितरण केल्यानंतर प्रति सदस्य 5 किलो तांदळाचे ही मोफत वितरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.