साखर उत्पादनात राज्याचा विक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/new-phaltan-sugar-sakharwa.jpg)
- दहा वर्षांत प्रथमच सात महिन्यांहून अधिक काळ सुरू होते गाळप
पुणे – साखर उत्पादनातील विक्रमापाठोपाठ सर्वाधिक काळ गाळप सुरू ठेवण्याचा विक्रम राज्यातील कारखान्यांनी केला आहे. तब्बल सात महिन्याहून अधिक काळ अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होता. ऐवढे महिने कारखाना सुरू राहणे गेल्या दहा वर्षांत प्रथमच घडले आहे.
राज्यात आज अखेरपर्यंत म्हणजे 14 मेपर्यंत 183 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्येच अनेक कारखाने बंद झाले होते. यंदा निम्मा मे महिना संपला तरी अनेक कारखान्यांचे गाळप सुरू होते. साखर आयुक्तालयाच्यावतीने राज्यातील गळीत हंगामाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात यंदा 187 साखर कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू झाला होता, यात 101 सहकारी आणि 86 खासगी कारखान्यांचा समावेश होता. यातील बहुतांशी कारखाने हे आतापर्यंत सुरू होते. आज 183 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केला असला तरी अजूनही चार ते पाच कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या आठवड्यात हा हंगाम संपेल अशी शक्यता आहे.
मे महिन्यापर्यंत साखर कारखाने सुरू राहण्याचा हा राज्यातील एक विक्रम मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उसाचे क्षेत्र घटत होते. त्यामुळे ऊस कमी झाल्याने कारखानेही लवकर बंद होत होते. काही कारखाने जेमतेम दोन महिने सुरू राहात होते. पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखाने वगळता इतर कारखाने जानेवारी अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारीमध्ये बंद होत होते. मात्र, गेल्यावर्षी पाऊस झाल्यामुळे यंदा उसाचे भरघोस पिक झाले. गाळप हंगाम सुरू झाला तसे कारखान्याची धुरांडी पटलेली होती.
आयुक्तालयाकडून आलेली आकडेवारी
यंदा आतापर्यंत साखरेचे झालेले उत्पादन : 1069.99 लाख क्विटल
गेल्यावर्षी झालेले साखरेचे उत्पादन : 420.01 लाख क्विटल
यंदा उसाचे गाळप : 931.69 लाख मेट्रीक टन
गेल्यावर्षी उसाचे गाळप : 373.13 लाख मेट्रीक टन
नांदेड विभागाची बाजी
अंतिम टप्यापर्यंत गाळप हंगाम सुरू असणाऱ्या कारखान्यांमध्ये नांदेड विभागातील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने बाजी मारली आहे. या कारखान्याचा गाळप हंगाम 15 मेपर्यंत सुरू होता. मे महिन्यापर्यंत आठ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होता. त्यात पुणे विभागातील विघ्नहर आणि माळेगाव या दोन कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांचा गाळप हंगाम अनुक्रमे 11 आणि 14 मेपर्यंत सुरू होता. याशिवाय एप्रिल महिन्यांत सर्वाधिक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. एप्रिलमध्ये 59 कारखान्यांचा गाळप संपला आहे.