संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार
![Apologies for the inconvenience caused to the students: Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Ajit-pawar-10.jpg)
मुंबई – कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवांरानी अभिवादन केलं.
वाचा :-कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच – मुख्यमंत्री
कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
सीमाभागातील मराठी बांधवांवर आणि महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणं ही हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली असणार असल्याचंही अजित पवार म्हणाले.