‘संभाजीनगर’चा वापर केवळ निवडणुकीपुरता’, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
नागपूर – कॉंग्रेसने औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यासाठी विरोध केला किंवा समर्थन केले, त्याचा काहीही फरक पडत नाही. पण एक मात्र खरे की शिवसेना संभाजीनगरचा वापर केवळ आणि केवळ निवडणुकीपुरता करते, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले.
वाचा :-‘संभाजीनगर’वरून शिवेसना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती- देवेंद्र फडणवीस
कॉंग्रेस शिवसेनेचा वापर सत्तेसाठी करते तर शिवसेना संभाजीनगरचा वापर निवडणुकीपुरता करते. निवडणूक झाली की ते हा मुद्दा विसरून जाता. आताही निवडणूक आहे म्हणून संभाजीनगरचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे आणि त्यांचे ठरल्याप्रमाणे कॉंग्रेस त्याला विरोध करते आहे.
एक जण करतो म्हणतंय आणि दुसरा करायचं नाही, असे म्हणतोय. ही सगळी नाटकं आहेत. खरं पाहिलं तर ही या दोन पक्षांची नुरा कुस्ती आहे. भावनिक मुद्दे उकरून जनतेची भलावण करण्याचं काम सत्तेतील हे दोन्ही पक्ष करीत असल्याचा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.
वाचा :-कोरेगाव भीमाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला पाहिजे, आठवलेंची मागणी
२०२० हे वर्ष महाराष्ट्राकरिता, देशाकरिता अतिशय आव्हानात्मक गेले आहे. अनेक संकटं या गेल्या वर्षात राज्यातील जनतेने झेलली. आता २०२१ हे वर्ष जनतेला सुखसमाधाने जावे, अशी मी प्रार्थना करतो. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेला आतापर्यंत त्रास भोगावा लागला. येणारे २०२१ हे सर्वांसाठी चांगले जावे आणि सरकारनेदेखील त्यांना मदत करावी, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस आज दुपारी चार वाजता पुणे महानगरपालिकेच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर राहणार आहेत. यावेळी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. याबाबत फडणवीसांना विचारले असता, त्यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे दुपारी चार वाजता पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात या दोन नेत्यांमध्ये कशी शाब्दिक जुगलबंदी रंगते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे.