संपामुळे एसटी महामंडळाचे 15 कोटींचे नुकसान
धुळे : राज्यभरात विविध ठिकाणी एसटीच्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला. संपामुळे एसटीचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्के बसेसच्या फेऱ्या सुटल्या, तर राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते.
राज्यातील 145 आगारांमध्ये काही प्रमाणात वाहतूक सुरु होती. तसेच राज्यातील 80 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवले.
तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 60 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 35 हजार 249 बस फेऱ्यांपैकी 10 हजार 397 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या. मात्र रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.