शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध, राज्य सरकारने जारी केली नियमावली
![Restrictions on Shiv Jayanti celebrations, rules issued by the state government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Shivaji_Maharaj.jpg)
मुंबई : येत्या 19 फेब्रुवारीला राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. कोरोना व्हायरसचे सावट यंदाच्या शिवजयंतीवर देखील पाहण्यास मिळत असून, शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाला असली तरीही धोका अद्याप टळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती अगदी साध्यापणाने साजरी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. केवळ 10 जणांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करता येणार आहे.
शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली –
- यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
- सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
- केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये.
- आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी.
- महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
- प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी असेल.
दरम्यान, राज्य सरकारने मर्यादित लोकांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करत नियमावली जाहीर केल्याने आता भाजपकडून यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.