शिक्षकांवर शासन “दंडेली’
![These employees will have Work From Home till May 2021, 28 days paid leave in case of corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/online-boy-img.jpg)
- बदलीची तक्रार करणाऱ्यांवर होणार पोलीस कारवाई; शासनाचे आदेश
पुणे – सध्या राज्यात शिक्षकांच्या बदल्या सुरू असून या बदल्यांबाबत राज्यातील बहुतांशी शिक्षकांमध्ये मोठी नाराजी आहे. यासाठीच जे शिक्षक या बदल्यांच्या तक्रारी किंवा विनंती अर्ज घेऊन जात आहेत अशांवर थेट पोलीस कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. याबाबत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 31 मे रोजी राज्य शासनाच्या अवर सचिवांकडून तसे पत्र पाठविण्यात आले आहे.
राज्यात सध्या शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या सुरू आहेत. यामध्ये शिक्षकांना ज्या ठिकाणी बदली हवी आहे अशा वीस शाळांचे पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांना शाळांवर बदली देण्यात आली आहे. मात्र पर्याय दिल्यानंतरही अगदी शेवटी भरलेल्या शाळा बदलीसाठी मिळाल्या असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासाठी शिक्षक वरिष्ठांकडे झालेली बदली रद्द करण्यासाठी विनंती अर्ज घेऊन फिरताना दिसत आहेत. ही सर्व बदली प्रक्रिया ऑनलाईन असल्याने कोणत्या निकषांवर व कशा प्रकारे करण्यात आली आहे, हे आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.
दरम्यान, याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले शिक्षक हे बदलीच्या अनुषंगाने सातत्याने नॅशनल इफॉर्मेशन सेंटर (एनआयसी) येथे भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्त्यय आणत आहेत. याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत की शिक्षकांनी बदल्यांचा विषय घेऊन एनआयसीमध्ये जाऊ नये किंवा दूरध्वनीवरून राज्य बदली समन्वयक प्रदीप भोसले यांच्याशी संपर्कही साधू नये. अशा प्रकारे दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास व्यत्त्यय आणल्याचे दिसल्यास संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच जर कोणी एनआयसीत जाण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कारवाई देखील होणार आहे.
शिक्षक न्यायालयात जाणार?
या बदली प्रक्रियेविरोधात काही शिक्षकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली असून येत्या काळात शासन शिक्षक असा संघर्ष पुन्हा पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अशा प्रकारे शिक्षक न्यायालयात गेले होते.