शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीने भाजप कार्यकर्त्यांचे गळफास आंदोलन
- दुष्काळी सांगोल्याचे पाणी बारामतीने पळविल्याचा आरोप
सांगोला ( महा ई न्यूज ) – दुष्काळी तालुक्याचे पाणी गेल्या 50 वर्षे बारामतीकरांनी पळविल्याचा आरोप जनता करु लागली आहे. त्यावर आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार आहे. त्या बैठकीत दुष्काळी सांगोल्याच्या हक्काचे पाणी पुन्हा बारामतीकडे वळविले जाईल, या भितीने भाजप कार्यकर्ते गळफास आंदोलन करु लागले आहेत.
दुष्काळी तालुक्यांसाठी निर्माण केलेल्या धरणातील पाणी आजवर बारामतीने परस्पर पळवले. करारनामे बदलले, हे करारनामे संपून गेल्यावरही पाण्याची ही लूट त्यांनी चालूच ठेवली. मात्र आता राज्य शासनाने पाण्याच्या या चोरीवर चाप लावला असून बारामतीला जाणारे हे पाणी बंद करण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यतील नीरा-देवघर, वीर, भाटघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायमस्वरूपी बंद झाल्यानंतर त्याचा लाभ फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या दुष्काळी तालुक्यांना होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (शुक्रवारी) मुंबई येथे बैठक होणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वळविले आहे. मुंबईतील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौकात सांगोल्यात गळफास घेणार आहेत.
दुष्काळी तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीला देऊ देणार नसल्याचे भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवाजी चौक येथील चिंचेच्या झाडास दोर लावून फास बांधण्यात आले आहेत, जर बैठकीत निर्णय सांगोलकरांच्या विरोधात गेल्यास अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार? असल्याने सांगोल्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.