शरद पवार नक्षलवाद्यांची भाषा का बोलत आहेत?
विनोद तावडे यांचा सवाल
मुंबई : गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, नक्षलवाद्यांची भाषा ते का बोलत आहेत, असा सवाल शिक्षणमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
गडचिरोलीतील हल्ला हा निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. पण, लगेच शरद पवार गृहखाते, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करीत आहेत. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय? १२ मार्चला १९९३ मध्ये जेव्हा बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी मुंबई हादरली होती, तेव्हा विधिमंडळात त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये अलीकडेच एक नक्षलवादी हल्ला झाला आणि त्यात भाजपाचे आमदार त्यात मारले गेले. त्या वेळी हेच पवार गप्प का होते?
केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणून? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्या निर्णयाला आपण याचसाठी का समर्थन दिले, असा प्रश्नही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.