‘शरद पवार जातीयवाद पसरवतात’, चंद्रकांत पाटील यांचा आरोप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आम्ही एवढे वाईट नाही, हे सरकार पाडण्याचा आम्ही कदापी प्रयत्न करणार नाही. हे सरकार आपोआप कोसळणार आहे. राज्यात सत्ता मिळाल्यानंतर शरद पवार जातीवाद निर्माण करतात, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
आकुर्डीत गुरुवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. सरकारमधील दररोज कोणीतरी काही बोलत आहे. काँग्रेसमध्ये प्रचंड तनाव आहे. हे सरकार आपोआप पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून येऊनही भाजपची सत्ता नसल्याने लोक आम्हाला विचारत आहेत, असे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला आहे. उदयनराजे भोसले यांना ते छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. भाजप गावोगावी जाऊन त्याचा निषेध करणार आहे. उदयनराजेंना पुरावा मागून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवप्रेमी, उदयनराजे यांचे कार्यकर्ते आता शांत बसणार नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला या गुंडाला भेटायला येत होत्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याची आम्ही निंदा करतो. परंतु, राऊत यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. त्याचा काँग्रेसने देखील विचार केला पाहिजे. काँग्रेसला मान्य असेल तर आम्हाला त्याचे काही घेणे देणे नाही, असीही टिका पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून जातिवाद निर्माण केला जातो. संभाजीराजे यांना भाजपने राज्यसभेवर खासदार केले. राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. त्यावेळी देखील पेशवे आता राजे ठरवितात असे विधान पवार यांनी केले होते. तुम्ही राज्यांसाठी काही करीत नाहीत. आम्ही केले तर बोलता. परंतु, लोकशाहीत कोणीही काहीही बोलू शकते, असेही ते म्हणाले. आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक मागे घेतले आहे. पुस्तक भाजपने लिहिलेले नव्हते. त्याचा भाजपशी काही संबंध नाही. त्या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल हे अगोदर शिवसेनेत होते, असेही पाटील म्हणाले.
मनसेचा भाजप सोबत येण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. तसे करायचे असेल तर मनसेला मराठी ही भूमिका बदलावी लागेल. तरच, भाजपचे नेतृत्व मनसेला सोबत घेण्याबाबत बसून निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.