शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे राष्ट्रवादी आता ‘आशावादी’ !
मुंबई – निवडणुकीला दहा-बारा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे वृत्तवाहिण्यांवर सर्वत्र पवारच दिसत होते. यातून राष्ट्रवादीला उभारी येणार अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, ऐनवळी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने ‘ईडी’मुळे तयार झालेला टेम्पो खाली आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांची साताऱ्यातील सभा पावसामुळे चर्चेत आली असून ही सभा राष्ट्रवादीसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले. एवढच नाही तर राज्यात काढलेल्या दौऱ्यातून पवारांनी तरुणांना आकर्षित करण्यात यश मिळवले. त्यातच ईडीनेदाखल केलेल्या गुन्ह्यामुळे पवाराविषयी आणखीच आकर्षण निर्माण झाले. एकंदरीत पवारांचा झंझावात निर्माण झाला होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे माध्यमांचं लक्ष शरद पवारांवरून बाजुला गेले होते.