विमानाला झाला पाच तास उशीर; लोहगाव एअर पोर्टवर प्रवाशांचे रात्रभर हाल
पिंपरी – पुण्याहून बेंगलोरला जाणारे एअर इंडिया कंपनीचे विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केल्याने रविवारी (दि. 23) पहाटे लोहगाव (पुणे) येथील विमान तळावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एअर पोर्ट प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना रात्री दिड वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले.
पुण्यातील रविवारी पहाटे 1.25 च्या विमानाने बेंगलोरला जाण्यासाठी पुणे-बेंगलोर एअर गो विमानाची प्रतिक्षा करत प्रवाशी विमानतळावर जमले होते. वेळेत विमान येणार म्हटल्यानंतर गेट नंबर 7 जवळ प्रवाशी येऊन थांबले होते. त्यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता एअर पोर्ट प्रशासनाने ते विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केले. त्यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी व्यवस्थापक सय्यद यांच्याशी विचारणा केली. त्यावर तांत्रिक बिघाडामुळे विमान उशिरा येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांना रात्री दीड वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत अख्खी रात्र विमानतळावर ताटकळत काढावी लागली.
नितीन यादव, रोहिणी यादव, कमलाकर कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, माधवी उंडे, बाबासाहेब सूर्यवंशी, सुरेखा सूर्यवंशी, स्मिता धायगुडे, विजया दाहोत्रे, सीता काची, योगेश काची, रेवती कटाप आदी प्रवाशांनी प्रशासनाच्या विरोधात प्रतक्रिया व्यक्त केल्या. या प्रकारामुळे एअर पोर्ट प्रशासनाचा अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.